Sunday, August 5, 2018

बालसाहित्यासमोरील आव्हानांच्या संदर्भाने विचार सुरू आहे. आव्हाने तर खूप आहेत पण आपण आपल्या परीने बालसाहित्य चळवळ सुरू ठेऊ. महाराष्ट्रातील साहित्य संस्थांनी पुढाकार घेऊन या बाबतीत काम करावे यासाठी प्रयत्नरत राहू. आजऱ्याचे श्री. विभुते सर जसे प्रयत्न करीत आहेत, तसे राज्यात इतरत्रही व्हावेत.मुलांना जे आवडते तेच देऊया, तरच ते वाचतील. चित्रांचा मुद्दा तर महत्वाचा आहेच. लेखन चित्रातूनही बालकाशी बोललं पाहिजे. किंबहुना, मुल बालसाहित्याचं पुस्तक हातात घेतल्यावर वाचण्याआधी सगळी चित्रे आधी पहात असते. त्यामुळेच पाश्चात्य बालसाहित्यात चित्रांची रेलचेल असते.
शासनाच्या धोरणानुसार CSR(Corporate Social Responsibility) अंतर्गत कंपन्यांना काही निधी सामाजिक कामासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. अनेक कंपन्या बालकांच्या विकासाच्या अनुषंगाने शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात आर्थिक योगदान देत आहेत. बालसाहित्य निर्मितीसाठी त्यांची काही मदत होऊ शकेल का याचा आपल्या स्तरावर विचार करता येईल. आम्ही औरंगाबादमध्ये त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत. कारण अनेक बालसाहित्यीक आर्थिक कारणाने आपलं लेखन पुस्तक रुपाने प्रसिद्ध करु शकत नाहीत. (यात लिहिणाऱ्या बालकांची-बाललेखकांची संख्या फार मोठी आहे.)
मनपा /नपा/जिप यांचेही सहकार्य या दृष्टीने मिळू शकते. त्यांच्या समोर हा मुद्दा व्यवस्थित मांडल्या गेला पाहिजे.
वितरण या मुद्द्यावर गांभीर्याने विचार होणे ही काळाची गरज आहे. मी लिहावे, मी छापावे आणि मीच वाचकापर्यंत जाण्यासाठी धडपडत रहावे हे बालसाहित्यीकाला शक्य होत नाही. या ग्रुपमध्ये राज्यातील सर्व भागातील सदस्य आहेत. आपल्याला एकत्र येऊन आपल्या कार्यक्षेत्रात वितरणासाठी काही यंत्रणा तयार करता येईल का? याचा विचार करुया. त्याचा सगळ्यांना फायदा होईल आणि पुस्तक राज्यभर जाऊ शकतील.
शेवटी महत्वाचे म्हणजे बालसाहित्यीकांना आजच्या बालवाचकाची स्पंदने टिपता आली पाहिजेत. मला जे आवडते किंवा लिहिता येते यापेक्षा बालकाला जे आवडते ते कसे देता येईल याचा विचार करायला हवा.
पाश्चात्य देशात बालसाहित्य हा एक महत्वाचा साहित्य प्रवाह आहे, ज्याची आर्थिक उलाढालही आपल्याला आश्चर्यचकित करणारी आहे. जॉन ग्रीन, डेविड विल्यम्स, जॅकलीन विल्सन, जेरेमी स्ट्राँग अशा इंग्रजीत लिहिणाऱ्या बाल-कुमार साहित्यिकांच्या वेबसाईट बघितल्या तरी त्याची प्रचिती येऊ शकते.
अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा होणे आणि प्रत्यक्षात त्यादृष्टीने पावलं उचलणे गरजेचे आहे.