Monday, March 16, 2026
........................
#गुणवत्तेचा_नवा_मापदंड_सांगणारी_बालकादंबरी
प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉ. विशाल तायडे यांची 'ढ' ही बालकादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. शीर्षक आणि मुखपृष्ठ पाहूनच वाचकांची उत्सुकता वाढावी असे हे पुस्तक आहे. अतिशय वेगळ्या विषयावरील ही एक प्रेरणादायी बालकादंबरी आहे. सर्वसाधारणपणे अशी धारणा असते की शाळेतील पुस्तकी अभ्यासात पुढे असणारे विद्यार्थीच गुणवंत असतात मात्र परीक्षेत कमी गुण पडणारे हे गुणवंत नसतात. वस्तुतः असे नसते तर प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये असू शकतात, फक्त आपण त्याच्याकडे कसे पाहतो हे महत्वाचे आहे. आणि याच विषयावर 'ढ' या बालकादंबरीतून लेखकाने प्रकाश टाकलेला आहे.
डॉ. विशाल तायडे यांचे यापुर्वीही अनेक बालकथा संग्रह व बालकादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे बालवाचकांनी मोठ्या प्रमाणात स्वागतही केलेले आहे आणि अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आलेले आहे. 'ढ' या बालकादंबरीमध्ये गजू हा विद्यार्थी व त्याचे निसर्गाशी तसेच सभोवतालचे प्राणी, पक्षी यांच्याशी असलेले नाते लेखकाने अतिशय सुंदर रितीने रेखाटलेले आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावरील ब्लर्ब मधूनच आपल्याला त्याची प्रचिती येते. सुरुवातीला पुस्तकाचे शीर्षक 'ढ' हे वाचून या बालकादंबरीमध्ये मठ्ठ अशा एखाद्या व्यक्तीचे कथानक असेल असे वाटते. मात्र आपण जशी ही कादंबरी पुढे पुढे वाचत जातो तसा आपल्याला कथानकाचा उलगडा होत जातो, जो फार सुखद आहे.
शिक्षणात नुसता पुस्तकी अभ्यास, गुण, श्रेणी न पाहता विविध कलागुणांनी साकारलेले गजूचे पात्र फार उत्तम रीतीने लेखकाने रंगवलेले आहे. आपल्या आजूबाजूला असेही काही विद्यार्थी असतीलच, शाळेत तर नक्कीच असतील. शाळा म्हटलं की शिक्षक आणि विद्यार्थी आलेच. गजूचा परिवार, त्याची परिस्थिती, शिक्षकांची त्याच्या बरोबरची वागणूक, दिलेले काम, शाळेतील गृहपाठ याविषयीचे संवाद मनाला भावतात. कथा वेगाने पुढे जात असल्यामुळे वाचकाला वाचायला उत्सुकता वाटते.
गजूला पडणारी स्वप्ने आणि त्यातून त्याला मिळणारा आनंद याचे खूप चांगल्या पद्धतीने वर्णन केलेले आहे. स्वप्ने महत्त्वाची असतात आणि त्यातून मिळणारा आनंद जीवनात महत्त्वाचा असतो. कादंबरीच्या उपकथानकामध्ये लेखकाने गजूच्या जीवनात घडलेल्या काही गमतीशीर बाबींचे वर्णन केलेले आहे. ज्यामुळे वाचकाला ही कादंबरी खिळवून ठेवते. गजू हरवल्याचा प्रसंग अशाच प्रकारचा आहे. गजू हरवल्याचे समजल्यावर घरातले सगळे वातावरण बदलते, गजूचा परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी इतर सर्वजण गजूची काळजी करतात. आपल्यावर सगळे एवढी माया करतात ही भावनाच गजूला उभारी देणारी असते.
या कादंबरीमध्ये आणखी एक महत्त्वाचे पात्र आहे, ते म्हणजे एका मांजरीचे. ही सोनी नावाची मांजर त्याच्या एकटेपणात त्याची जिवलग मैत्रीण ठरते, मात्र नंतर ती त्याच्यापासून दूर होते, हे गजूसाठी दुःखदायक असते. तो प्रसंग वाचून वाचकही हेलावून जातो. गजूला मांजरीचा लळा लागल्याचे वर्णन प्रत्येकाच्या आयुष्यात आलेल्या अशा प्रकारच्या अनुभवांची आठवण करून देणारे आहे. आजी आणि आई सोबत गजूचे फार आपुलकीचे नाते आहे. त्या दोघीही त्याला वेळोवेळी जपतात. याचे गजूला खूप समाधान वाटते.
गजूच्या शाळेतील स्नेहसंमेलनाचा प्रसंग हा खरं तर या बालकादंबरीतला गजूच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गजू आणि त्याच्या आवडत्या शिक्षिका कदमबाई यांच्यातील आपुलकीच्या नात्याचे लेखकाने फार चांगल्याप्रकारे वर्णन केल्याचे दिसून येते. आपल्या प्रत्येकाच्या शालेय जीवनात एक तरी असा शिक्षक असतो की ज्याची आठवण आपल्याला आयुष्याभर येत राहते. गजू आणि कदमबाईंमधील संवाद वाचल्यावर आपल्याला आपल्या आवडत्या शिक्षकाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
ही बाल कादंबरी विद्यार्थ्यांच्या शालेय संपादणूकीकडे एका नव्या दृष्टीने आपल्याला पहायला लावते. 'मला काय येते यापेक्षा मला काय येत नाही यावरच सगळे बोलत असतात.' हे गजूचे वाक्य आपल्याला विचार करायला भाग पाडते. परीक्षेत गुण कमी पडतात म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला ढ किंवा गुणवत्तेत कमी असल्याचे समजावे का असा प्रश्न आपल्याला ही कादंबरी वाचल्यावर साहजिकच पडतो. लेखकाने कथानकाच्या दरम्यान आपला मुद्दा स्पष्ट करताना मानसशास्त्रीय संशोधनांचाही उपयोग केलेला आहे. त्यामुळे आपल्याला हा मुद्दा मनोमन पटतो. ही बालकादंबरी वाचून संपल्यावर या गजूला 'ढ' कसे म्हणता येईल असा विचार प्रत्येक वाचकाला पडतो.
एकटेपणातून चित्रकलेकडे वळलेला गजू आणि सरावाने या कलेत कौशल्य प्राप्त केल्यावर मिळणारी संधी हे प्रत्येक बालकाला प्रेरणादायी ठरू शकते. व्यक्ती जेव्हा मिळालेल्या संधीचे सोने करते तेव्हा निश्चितच त्याला यश मिळत असते हा एक महत्त्वाचा संदेश या कादंबरीतून लेखकाने दिला आहे. हावर्ड गार्डनर या सुप्रसिद्ध अमेरिकन बालमानसशास्त्राच्या संशोधनाचा संदर्भ देताना बालकातील बुद्धिमत्तेचे विविध पैलू लेखकाने गजूच्या उदाहरणातून आपल्यासमोर स्पष्ट केले आहेत. केवळ परीक्षेतील गुणांचा विचार न करता बुद्धिमत्तेच्या विविध पैलूंचा विचार करूनच विद्यार्थ्यांच्या वाढ व विकासाकडे बघितले पाहिजे. बालकांनी लहानात लहान यश जरी मिळवले तरी त्याच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप ही त्याचा आत्मविश्वास वाढवणारी असते याकडे लेखकाने वाचकांचे लक्ष वेधले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील सौरव प्रकाशनने ही बालकादंबरी प्रकाशित केलेली आहे. पुस्तकाचे निर्मिती मूल्य अतिशय उच्च आहे. या बालकादंबरीचे मुखपृष्ठ व रेखाचित्रे बुद्धभूषण लोंढे या विद्यार्थ्याने काढलेले आहेत हे विशेष उल्लेखनीय आहे. मुखपृष्ठावरील निसर्ग, आकाशातील ग्रह, तारे, राशी, निळेशार आकाश, पाठमोरा गजू, मांजर, दप्तराची बॅग व त्यावर असलेले पुस्तके या सर्व बाबी बाल कादंबरीचा आशय सांगण्यास पूरक आहेत. त्यातील विस्तीर्ण निळे आकाश हे वाचकाच्या मनाला भावणारे आहे. असे विस्तीर्ण आकाश म्हणजे गजू सारख्या बालकाला आयुष्यात यश मिळवण्यासाठी अशा विस्तीर्ण संधी उपलब्ध होऊ शकतात असा संदेश देणारे आहे. मुखपृष्ठावरील गजूचे पाठमोरे चित्र आणि शेवटी आपल्याकडे बघणारा हसऱ्या चेहऱ्याचा गजू ही चित्रे अतिशय प्रतीकात्मक झालेली आहेत. या ७२ पृष्ठांच्या बाल कादंबरीमध्ये जागोजागी अतिशय देखणी अशी चित्रे आलेली आहेत. हे चित्रे कथानकाला अतिशय समर्पक आहेत.
या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानाच्या मागे न लागता विविध कौशल्य आत्मसात करायला हवीत हे गोष्टी रुपाने आणि अभ्यासपूर्ण रितीने विशाल तायडे यांनी मांडले आहे. 'ढ' कोणीही नसतो, फक्त प्रत्येकाची गुणवत्ता कोणत्या क्षेत्रात आहे हे ओळखून त्याला प्रगतीची संधी दिली पाहिजे हा अतिशय मोलाचा संदेश देणारी ही बालकादंबरी आहे. प्रत्येकाने वाचावी आणि इतरांनाही वाचायला प्रवृत्त करावे, असे हे पुस्तक लिहिल्याबद्दल लेखक विशाल तायडे यांचे अभिनंदन करायला हवे. ही बालकादंबरी प्राप्त करण्यासाठी श्री मिलींद जगताप 98 22 55 11 72 या क्रमांकावर संपर्क करता येईल.
'ढ'
विशाल तायडे
प्रकाशक : सौरव प्रकाशन,
छत्रपती संभाजीनगर
पृष्ठे : ७२
किंमत : शंभर रुपये
समीक्षण
डॉ. नंदकिशोर डंबाळे, जालना.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment