Monday, March 16, 2026

........................ #गुणवत्तेचा_नवा_मापदंड_सांगणारी_बालकादंबरी प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉ. विशाल तायडे यांची 'ढ' ही बालकादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. शीर्षक आणि मुखपृष्ठ पाहूनच वाचकांची उत्सुकता वाढावी असे हे पुस्तक आहे. अतिशय वेगळ्या विषयावरील ही एक प्रेरणादायी बालकादंबरी आहे. सर्वसाधारणपणे अशी धारणा असते की शाळेतील पुस्तकी अभ्यासात पुढे असणारे विद्यार्थीच गुणवंत असतात मात्र परीक्षेत कमी गुण पडणारे हे गुणवंत नसतात. वस्तुतः असे नसते तर प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये असू शकतात, फक्त आपण त्याच्याकडे कसे पाहतो हे महत्वाचे आहे. आणि याच विषयावर 'ढ' या बालकादंबरीतून लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. डॉ. विशाल तायडे यांचे यापुर्वीही अनेक बालकथा संग्रह व बालकादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे बालवाचकांनी मोठ्या प्रमाणात स्वागतही केलेले आहे आणि अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आलेले आहे. 'ढ' या बालकादंबरीमध्ये गजू हा विद्यार्थी व त्याचे निसर्गाशी तसेच सभोवतालचे प्राणी, पक्षी यांच्याशी असलेले नाते लेखकाने अतिशय सुंदर रितीने रेखाटलेले आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावरील ब्लर्ब मधूनच आपल्याला त्याची प्रचिती येते. सुरुवातीला पुस्तकाचे शीर्षक 'ढ' हे वाचून या बालकादंबरीमध्ये मठ्ठ अशा एखाद्या व्यक्तीचे कथानक असेल असे वाटते. मात्र आपण जशी ही कादंबरी पुढे पुढे वाचत जातो तसा आपल्याला कथानकाचा उलगडा होत जातो, जो फार सुखद आहे. शिक्षणात नुसता पुस्तकी अभ्यास, गुण, श्रेणी न पाहता विविध कलागुणांनी साकारलेले गजूचे पात्र फार उत्तम रीतीने लेखकाने रंगवलेले आहे. आपल्या आजूबाजूला असेही काही विद्यार्थी असतीलच, शाळेत तर नक्कीच असतील. शाळा म्हटलं की शिक्षक आणि विद्यार्थी आलेच. गजूचा परिवार, त्याची परिस्थिती, शिक्षकांची त्याच्या बरोबरची वागणूक, दिलेले काम, शाळेतील गृहपाठ याविषयीचे संवाद मनाला भावतात. कथा वेगाने पुढे जात असल्यामुळे वाचकाला वाचायला उत्सुकता वाटते. गजूला पडणारी स्वप्ने आणि त्यातून त्याला मिळणारा आनंद याचे खूप चांगल्या पद्धतीने वर्णन केलेले आहे. स्वप्ने महत्त्वाची असतात आणि त्यातून मिळणारा आनंद जीवनात महत्त्वाचा असतो. कादंबरीच्या उपकथानकामध्ये लेखकाने गजूच्या जीवनात घडलेल्या काही गमतीशीर बाबींचे वर्णन केलेले आहे. ज्यामुळे वाचकाला ही कादंबरी खिळवून ठेवते. गजू हरवल्याचा प्रसंग अशाच प्रकारचा आहे. गजू हरवल्याचे समजल्यावर घरातले सगळे वातावरण बदलते, गजूचा परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी इतर सर्वजण गजूची काळजी करतात. आपल्यावर सगळे एवढी माया करतात ही भावनाच गजूला उभारी देणारी असते. या कादंबरीमध्ये आणखी एक महत्त्वाचे पात्र आहे, ते म्हणजे एका मांजरीचे. ही सोनी नावाची मांजर त्याच्या एकटेपणात त्याची जिवलग मैत्रीण ठरते, मात्र नंतर ती त्याच्यापासून दूर होते, हे गजूसाठी दुःखदायक असते. तो प्रसंग वाचून वाचकही हेलावून जातो. गजूला मांजरीचा लळा लागल्याचे वर्णन प्रत्येकाच्या आयुष्यात आलेल्या अशा प्रकारच्या अनुभवांची आठवण करून देणारे आहे. आजी आणि आई सोबत गजूचे फार आपुलकीचे नाते आहे. त्या दोघीही त्याला वेळोवेळी जपतात. याचे गजूला खूप समाधान वाटते. गजूच्या शाळेतील स्नेहसंमेलनाचा प्रसंग हा खरं तर या बालकादंबरीतला गजूच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गजू आणि त्याच्या आवडत्या शिक्षिका कदमबाई यांच्यातील आपुलकीच्या नात्याचे लेखकाने फार चांगल्याप्रकारे वर्णन केल्याचे दिसून येते. आपल्या प्रत्येकाच्या शालेय जीवनात एक तरी असा शिक्षक असतो की ज्याची आठवण आपल्याला आयुष्याभर येत राहते. गजू आणि कदमबाईंमधील संवाद वाचल्यावर आपल्याला आपल्या आवडत्या शिक्षकाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. ही बाल कादंबरी विद्यार्थ्यांच्या शालेय संपादणूकीकडे एका नव्या दृष्टीने आपल्याला पहायला लावते. 'मला काय येते यापेक्षा मला काय येत नाही यावरच सगळे बोलत असतात.' हे गजूचे वाक्य आपल्याला विचार करायला भाग पाडते. परीक्षेत गुण कमी पडतात म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला ढ किंवा गुणवत्तेत कमी असल्याचे समजावे का असा प्रश्न आपल्याला ही कादंबरी वाचल्यावर साहजिकच पडतो. लेखकाने कथानकाच्या दरम्यान आपला मुद्दा स्पष्ट करताना मानसशास्त्रीय संशोधनांचाही उपयोग केलेला आहे. त्यामुळे आपल्याला हा मुद्दा मनोमन पटतो. ही बालकादंबरी वाचून संपल्यावर या गजूला 'ढ' कसे म्हणता येईल असा विचार प्रत्येक वाचकाला पडतो. एकटेपणातून चित्रकलेकडे वळलेला गजू आणि सरावाने या कलेत कौशल्य प्राप्त केल्यावर मिळणारी संधी हे प्रत्येक बालकाला प्रेरणादायी ठरू शकते. व्यक्ती जेव्हा मिळालेल्या संधीचे सोने करते तेव्हा निश्चितच त्याला यश मिळत असते हा एक महत्त्वाचा संदेश या कादंबरीतून लेखकाने दिला आहे. हावर्ड गार्डनर या सुप्रसिद्ध अमेरिकन बालमानसशास्त्राच्या संशोधनाचा संदर्भ देताना बालकातील बुद्धिमत्तेचे विविध पैलू लेखकाने गजूच्या उदाहरणातून आपल्यासमोर स्पष्ट केले आहेत. केवळ परीक्षेतील गुणांचा विचार न करता बुद्धिमत्तेच्या विविध पैलूंचा विचार करूनच विद्यार्थ्यांच्या वाढ व विकासाकडे बघितले पाहिजे. बालकांनी लहानात लहान यश जरी मिळवले तरी त्याच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप ही त्याचा आत्मविश्वास वाढवणारी असते याकडे लेखकाने वाचकांचे लक्ष वेधले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सौरव प्रकाशनने ही बालकादंबरी प्रकाशित केलेली आहे. पुस्तकाचे निर्मिती मूल्य अतिशय उच्च आहे. या बालकादंबरीचे मुखपृष्ठ व रेखाचित्रे बुद्धभूषण लोंढे या विद्यार्थ्याने काढलेले आहेत हे विशेष उल्लेखनीय आहे. मुखपृष्ठावरील निसर्ग, आकाशातील ग्रह, तारे, राशी, निळेशार आकाश, पाठमोरा गजू, मांजर, दप्तराची बॅग व त्यावर असलेले पुस्तके या सर्व बाबी बाल कादंबरीचा आशय सांगण्यास पूरक आहेत. त्यातील विस्तीर्ण निळे आकाश हे वाचकाच्या मनाला भावणारे आहे. असे विस्तीर्ण आकाश म्हणजे गजू सारख्या बालकाला आयुष्यात यश मिळवण्यासाठी अशा विस्तीर्ण संधी उपलब्ध होऊ शकतात असा संदेश देणारे आहे. मुखपृष्ठावरील गजूचे पाठमोरे चित्र आणि शेवटी आपल्याकडे बघणारा हसऱ्या चेहऱ्याचा गजू ही चित्रे अतिशय प्रतीकात्मक झालेली आहेत. या ७२ पृष्ठांच्या बाल कादंबरीमध्ये जागोजागी अतिशय देखणी अशी चित्रे आलेली आहेत. हे चित्रे कथानकाला अतिशय समर्पक आहेत. या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानाच्या मागे न लागता विविध कौशल्य आत्मसात करायला हवीत हे गोष्टी रुपाने आणि अभ्यासपूर्ण रितीने विशाल तायडे यांनी मांडले आहे. 'ढ' कोणीही नसतो, फक्त प्रत्येकाची गुणवत्ता कोणत्या क्षेत्रात आहे हे ओळखून त्याला प्रगतीची संधी दिली पाहिजे हा अतिशय मोलाचा संदेश देणारी ही बालकादंबरी आहे. प्रत्येकाने वाचावी आणि इतरांनाही वाचायला प्रवृत्त करावे, असे हे पुस्तक लिहिल्याबद्दल लेखक विशाल तायडे यांचे अभिनंदन करायला हवे. ही बालकादंबरी प्राप्त करण्यासाठी श्री मिलींद जगताप 98 22 55 11 72 या क्रमांकावर संपर्क करता येईल. 'ढ' विशाल तायडे प्रकाशक : सौरव प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर पृष्ठे : ७२ किंमत : शंभर रुपये समीक्षण डॉ. नंदकिशोर डंबाळे, जालना.
................................ पुस्तक:-"ढ" ----------------------------------------------------- लेखक:- डॉ विशाल तायडे ------------------------------------------------------ प्रकाशन:-सौरव प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर ------------------------------------------------------- प्रकाशक:-मिलिंद बाबुराव जगताप, छत्रपती संभाजीनगर ------------------------------------------------------- मुखपृष्ठ व रेखाचित्रे:- बुद्धभूषण लोंढे, पुणे ------------------------------------------------------ प्रथम आवृत्ती:- ९ डिसेंबर २०२५ ------------------------------------------------------- किंमत:- १०० रूपये ------------------------------------------------------ पुस्तक परिचय:-डॉ. प्रभाकर शेळके, जालना संपर्क:-९९७५१३७३३७ -------------------------------------------------------- #बालकांचे_कौशल्य_विकसित_करणारी_कांदबरी_:"ढ" डॉ. प्रभाकर शेळके, जालना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार विजेते डॉ. विशाल तायडे यांची "ढ" ही बालमानसशास्त्र उलगडून दाखवणारी एक उत्कृष्ट बालकादंबरी आहे. तसेच बालक, पालक व शिक्षक यांचे मन समृद्ध करणारी आहे. आपल्याला बाळ जन्माचा आनंद असतो. पुढे शिक्षण व संस्कार शिदोरी बांधून मुलांचे व्यक्तिमत्त्व विकसित होते. तो आनंद मौलिक असतो. आजच्या एआयच्या जगात हे सारे पाह्यला मिळते. तुज कळते परि ना वळते. मग उगीची मनाला छळते. बाल मनावर संस्कार गिरवताना त्याची रुची संपन्नता पाहूनच त्याला कौशल्य प्राप्त करता येते. या बालकादंबरीचा नायक गजू. गजूला शालेय पुस्तकात रुची नाही. त्याला सभोवताल आवडतो. शाळा बाहेरचे विश्व आवडते. फुलपाखरू, फुलांचे रंग, वानर, झाडं, पाने, फुले, आकाश, चंद्र, चांदणे यात तो रंगून जातो. त्याच्या वहीत आई ,आजीचे चित्र, शाळेतले काळे सर, हेडमास्तर, झाडुवाली मावशी, शाळेचा शिपाई यांची चित्रे. आईचं चित्र काढलं की आजीचे चित्र तयार करता येते. फक्त तोंडावर सुरकुत्या काढले की झाले आजीचे चित्र. त्याची सोनी मांजर. तिचे हुबेहूब चित्र. त्याला फुलपाखरू होऊन उडावे वाटते. त्याला क्रिकेट खेळणे भंयकर आवडते; पण मित्र त्याला खेळात घेतं नाहीत. कारण त्याला खेळात घेतलं तर आपण जिंकणार नाही असं त्यांना वाटतं. गजू स्वप्न पाहतो. त्याला सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर बॅटिंग करायला मिळते. सचिन त्याच्या कानात येऊन बोलतो. तो धुंवाधार बॅटिंग करतो. भारताला मॅच जिंकून देतो. आई बाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वप्न पूर्ण होते. तो शाळेत पाठीमागे बसतो. काळे गुरूजी त्याला 'ढ' ही पदवी देऊन टाकतात.मग सारेच त्याला 'ढ' म्हणतात. यामुळे त्याला मित्रमंडळ नसते. तो आपल्या वहीत चित्र काढत असतो. त्याचे भावविश्व म्हणजे मन मुक्त जगावे. गजू हरवल्याची गोष्ट सांगतो. गजू का हरवतो. आई त्याला मार्केटला सोबत घेऊन जात नाही. तो रडतो, रूसतो. गच्चीवर टेरेसवर जाऊन झोपून राहतो. हे कुणालाच माहीत नसते. खूप वेळ हे नाट्य चालू असते. फोन, शेजारी पाजारी, पोलिस स्टेशन, आई रडते तेव्हा त्याला जाग येते. लोकं जमा होतात. शेवटी गजू सापडतो. आईचे रडणे पाहुन तोही रडतो...त्यावेळेस आईचे आसवांनी भरलेले डोळे. आई रडते तेव्हा तोही रडतो. आईने त्याला आपल्या कवेत घेऊन कवटाळणे, आजीच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव, ताईचे ओतप्रोत प्रेम. हा प्रसंग वाचकांना व्याकुळ करुन जातो. सारी मुलं स्नेहसंमेलनात विविध स्पर्धेसाठी जातात. कदमबाई गजूला शोधत वर्गात येतात. तो खिडकीत बसून चित्र काढीत असतो. गजू थोडा तोतरा बोलतो. त्यामुळे सारी मुलं हसतात. गजूला अवघड नावे उच्चारायला कठीण जाते जसे- सभागृह. तो मनाने निर्मळ, निर्लेप आणि नितळ स्वभावाचा मुलगा आहे. कदमबाई त्याला स्नेहसंमेलनात मुक अभिनय करण्यासाठी सहभागी करून घेतात. कदमबाईने गजूच्या मनात आत्मविश्वास निर्माण केलेला असतो. गजूचा अभिनय उत्तम झाला. "आई बाबांचे डोळे भरून आले. आई, बाबा, आजी, ताई स्टेजच्या पाठीमागे आले. कदमबाईने त्याला घट्ट पोटाशी धरलं. टाळ्यांच्या गजरात गजूचे डोळे पाणावले. बाबांना तर काय करु आणि काय नको असं झालं होतं. त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. ते 'माझा गजू' असं म्हणतं माझे मुके घेत होते. त्यांच्या कडेवर मला खूप छान वाटत होतं. कारण कितीतरी वर्षांनी बाबांनी मला जवळ घेतलं होतं."(पृष्ठ ५१) हा प्रसंग लेखकाने अतिशय आशय संपन्न मांडला आहे. वाचकांचे अंतरंग हेलावून टाकणारे प्रसंग आहे. बालमनाचे भावविश्व जसे - गजूला फुलपाखरू व्हावे, झाडं व्हावे, मांजरीचे नखे वाढले आहेत ती काढावी. आई कसे माझी नखे वाढू देतं नाही. गजू सोनी मांजरीचे नखे काढतो तेव्हा ती बोचकारते. गजू रक्तबंबाळ होतो. गजूला बोचकारले म्हणून सोनीची घरातून हकालपट्टी होते. गजूला वाईट वाटते. माझ्यामुळे सोनी घर सोडून गेली... हे प्रसंग हळवे करून जातात. स्नेहसंमेलनात गजूचा अभिनय चांगला झाला; पण अभ्यासही कर असे म्हणणारे काळे सरांचे नितळ श्रेध्दय मन इथं दिसून येते. गजू सहावीत जातो. कदममॅडम व मुख्याध्यापक यांच्यातील अभ्यासपूर्ण संवाद हा महत्त्वाचा आहे. जसे "प्रत्येक मुलं पुस्तकी अभ्यासातच हुशार असतं असं नाही. मुलामध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात. आपण त्या क्षमता ओळखला हव्यात आणि त्याप्रमाणे त्यांना संधी द्यायला हवी."(पृष्ठ ५२)मुख्याध्यापकाच्या परवानगीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गजूच्या चित्रांचे प्रदर्शन ठेवल्या जाते. हेडसर, काळेसर, कदम मॅडम, केशव मामा, ही हुबेहूब चित्र पाहून हेडसर खुश होतात. प्रजास्ताक दिनी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते फित कापून चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होते. आई, आजी आणि बाबांच्या डोळ्यात आंनदाचे अश्रू येतात. गजू स्टेजवर मागे बसलेला असतो. प्रमुख पाहुणे भाषणात गजूच्या चित्रांचे कौतुक करून अभिनंदन करतात. शेवटी मोरेकाका उठतात. ते म्हणतात की मी आनंदाची बातमी सांगू इच्छितो. "फ्रांसची राजधानी पॅरिस येथे चित्रांचे जागतिक स्तरावरील प्रदर्शन भरते. यात जगभरातले चित्रकार सहभागी होतात. हजारो डाॅलर्संना या चित्रांची खरेदी विक्री होते. गजूचे चित्र मी पाठवले होते. त्यातल्या एका चित्राची निवड झाल्याचा ई-मेल आलेला आहे. गजाननचे मुळचित्र या प्रदर्शनात ठेवण्यासाठी मागितले आहे. हा गजाननसाठी, शाळेसाठी आणि आपल्या सर्वांसाठी फार मोठा सन्मान आहे "(पृष्ठ ६७) अशी ही मनोज्ञ दर्शक गोष्ट आहे. मलपृष्ठावर लेखक विशाल तायडे सर लिहितात "मी गजू, तुम्ही माझी गोष्ट वाचताय याचा मला खूप आनंद होत आहे. या गोष्टीतून मी तुम्हाला मी खूप गमती जमती सांगणार आहे. आणि माझ्या मित्रांची ओळख करून देणार आहे. फुलं, फुलपाखरू, नदी डोंगर, झाडे हे सगळे माझे मित्र आहेत. माझी एक मैत्रीण आहे. सोनी तिचं नाव. पण मला ना सगळे "ढ"समजतात. मठ्ठ, बुध्दू म्हणतात. कारण काय तर म्हणे मला परीक्षेत कमी मार्क पडतात. मला काहीचं येतं नाही. सगळ्यांना वाटतं. मात्र माझी ही गोष्ट वाचल्यावर तुम्हीच ठरवा की, मी "ढ"आहे का ते?"(मलपृष्ठ) बालमनाचा मानसशास्त्रीय समुपदेशक या भूमिकेतून एक सृजनशील, चिंतनशील, चिकित्सक निस्सीम अभ्यासक डॉ विशाल तायडे यांच्या या बालकांदबरीत ते पालक, बालक, अध्यापक यांना शिक्षण संजीवनी देऊन जातात, जसे - "हावर्ड गार्डनर या अमेरिकन अभ्यासकानेही संशोधन आणि प्रयोगामधून हे दाखवून दिले आहे, की मानवी बुद्धीमत्ता ही एक प्रकारची नसते. तर ती आठ प्रकारच्या असतात. त्याला त्यांनी 'बहुविध बुध्दीमत्ता' असे म्हटले आहे. उदाहरणच सांगायचे झाले तर एखाद्या खेळाडूकडे शारीरिक बुध्दीमत्ता अत्यंत चांगली असेल; पण त्याच्याकडे गणितीय किंवा संगीताची बुध्दीमत्ता उत्तम असेलच असे नाही. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचेच उदाहरण घ्या ना. त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले; मात्र खेळामध्ये जागतिक स्तरावर नाव कमावले. आपल्या देशाने तर भारतरत्न म्हणून त्यांचा गौरव केला. हे कशामुळे शक्य झाले? तर बालपणातच त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांचे खेळातील कौशल्य ओळखून, त्यांना त्यात संधी दिली."(पृष्ठ ५३) बालमानसशास्त्र उलगडून दाखवणारी ही कादंबरी खूपच अप्रतिम, आशय संपन्न, सृजन समर्पक झाली आहे. बालसाहित्यिक विशाल तायडे अभ्यासक आहेत ते पालकांसाठी दोन शब्द लिहितात "प्रत्येक मुलं जन्माला येतं ते स्वतंत्र माणूस म्हणून. त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. ते हळूहळू शिकत राहतं आणि फुलतं राहतं. कधीकधी त्याची वाढ आणि विकासाची प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे होतं नाही. आपण सहज इतर मुलांसोबत त्याची तुलना करतो. परीक्षेच्या गुणावरून त्याचे मूल्यमापन करतो. कमी गुण मिळणारा 'ढ'ठरतो. खरचं तो 'ढ'असतो का? की आपल्या मोजपट्या कमी पडतात? आपण त्याच्या अंगातील कौशल्य शोधून त्याला त्याचे कौशल्य विकसित केले पाहिजे."(दोन शब्द) या बालकादंबरीचे मुखपृष्ठ अतिशय अर्थवलयांकीत व आतील रेखाचित्रे मनोवेधक आहेत. चित्रकार बुद्धभूषण लोंढे यांच्या मनस्वी चिंतनातून ते आले आहेत. निळे निरभ्र आकाश. आकाश गंगेतील ग्रह, तारे व कुत्रा, मांजर, राॅकेट, चंद्र, तारे, गोष्टीचा नायक गजू. खांद्यावर बसलेली सोनी मांजर, दप्तर आणि चित्रांच्या वह्या व फक्त "ढ" हे अक्षर. सौरव प्रकाशनचे मिलिंद जगताप यांनी देखणी कलाकृती दिली आहे. सन्मित्र विशाल तायडे यांच्या लेखनास हार्दिक शुभेच्छा. ============================
'ढ' मुलाच्या यशाची उत्तुंग भरारी आजच्या टक्केवारीच्या प्रचंड वादळात गुणवत्ता हरवली आहे. मुलांचा सर्वांगिण विकास नेमका कोणता आणि कसा याचे उत्तरही अधांतरीच राहते. शालेय जीवनात बालकुमारांच्या मानसिकतेचा कितीएक आईवडील आणि शिक्षक विचार करीत असतील, हाच मुळात चिंतनाचा विषय आहे. घर-कुटूंब, शाळा आणि समाज अशा वातावरणात बालकांच्या भावविश्वाला कसे हाताळायचे या प्रश्नाचे उत्तरही निश्चित असू शकत नाही. टक्केवारीची जीवघेणी स्पर्धा यासह शिक्षणातील जीवनकौशल्याचा अभाव दूर होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मुलांच्या भावना समजून घेणे, इतरांशी तुलना न करणे यासह आत्मविश्वास कसा निर्माण करता येईल, यासाठी धडपड करणारे शिक्षक असतात, अशा एक ना अनेक विषयावर कथेच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे प्रेरक लेखन बालसाहित्यिक डॉ. विशाल तायडे यांनी 'ढ' या कथासंवादातून केले आहे. लेखक डॉ. तायडे यांनी शाळा, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, आईवडील यासह बालमनावर कौटुंबिक घटनांचा कसा परिणाम होतो, अशा विषयावर 'ढ' या स्वगत संवादातून चित्रण मांडले आहे. कमी गुण मिळविणारा 'ढ' मुलगा म्हणजे कोण असा प्रश्न उपस्थित करीत कथेला सुरुवात होते. शाळेत जाणारा एक गजू नावाचा 'ढ' मुलगा आहे. घरचे आईवडील, शाळेतील मित्र, शिक्षक कसे वागतात इथपासून ते शाळेतील प्रेरणा देणाऱ्या कदमबाई, हेडसर, चित्रकार मोरे अशा पात्रामधून' ढ' कथा वाचकाला खिळवून ठेवते. वर्गात 'ढ 'म्हणून सतत अवहेलना होणारा गजू, घरातही आई आणि आजी सोडली तर इतरांच्या तुलनेत चेष्टेचा विषय होणाऱ्या गजाननाच्या मानसिकतेचा विचार कथेतून अधोरेखित होतो. चौथीपासून ते सहावी वर्गातील अनेक घटनांचा संदर्भकथेतून सुंदरपणे रेखाटला आहे. शाळेतील वर्गाबाहेर सरांनी हाकलून दिलेला गजू आणि वर्गाबाहेर निसर्गातील पाने-फूले, वृक्ष वेली, पक्षी, गुलाबाचे फूल आणि त्याची भावना गजूला कशी प्रेरक ठरते, अशा अनेक घटनांचा अर्थ कथेचा नायक स्वगतात मांडतो. कथेतील पहिल्या प्रसंगात नायक स्वगत मांडतो ते असे, की' सरांनी वर्गाबाहेर उभं राहायला सांगितलं, की मी फुलपाखर बनून उडत उडत त्या फुलावर जाऊन बसलो असतो. यातून नायकाच्या मनातील घालमेल आणि विचार कसे हे अधोरेखित होते. कथेतील चित्र काढणारा नायक, शाळेतील प्रजासत्ताक दिन समारंभात मुकाभिनय करणारा गजू आणि शाळेत भरलेल्या चित्र प्रदर्शनाचा हिरो ठरणारा गजू असा प्रवास लेखनाने बालकुमारांचे भावविश्व जपत प्रसंग डोळ्यासमोर उभे केले आहे. स्वगत मांडताना नायकाला कोणते स्वप्न पडते, आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर समवेत आपण खेळलो असल्याचे स्वप्न कसा अदम्य आत्मविश्वास निर्माण करते, हा विचार कथेतून प्रेरणा देणारा ठरतो. मुलांकडे दूर्लक्ष करणारा बाप नंतर मुलांसाठी कोणती गोष्ट करतो, की त्यामुळे बाप लेकाचे नाते अधिक घट्ट होत जाते, अशा प्रसंगाचे चित्रण भावनिक अन नातेबंधाला ओलावा देणारे कसे ठरते, हे समर्पकपणे मांडताना लेखक डॉ. तायडे यशस्वी ठरतात. कथा संवादाची भाषा साधी, सोपी असल्याने सहजपणे मनाचा ठाव घेते. कथेतील प्रसंग' गजूचे हरवणे, घरात आत्या येणे, वडिलाने गजूला बाहेर घेवून जाणे आणि चित्रकलेचे साहित्य देणे, शाळेतील स्नेहसंमेलन, प्रजासत्ताक दिन, चित्रप्रदर्शन अशा अनेक प्रसंगाचे स्वगत कथेचा नायक मांडतो तेव्हा रसिक वाचकही या भावविश्वात हरवून जातो. असा अनुभव पुस्तक वाचताना येतो. डॉ. विशाल तायडे यांचे बालकुमारांचे भावविश्व यावर सखोल चिंतन आहे. यातून 'मैत्री, छोट्या राजूची मोठी गोष्ट गोलू आणि राजू' या बाल कादंबरीतून बालमानसिकतेचा प्रश्न मांडला आहे. एरव्ही अनुवादाच्या लेखनात रमलेल्या डॉ. तायडे यांनी 'पतंग, प्राण्यांचा व्हाट्सअप आणि इतर गोष्टी, सईचे पंख' अशा बालकथासंग्रहातून बालकुमारांच्या भावविश्वाला प्राधान्य दिल्याचे लेखनसाहित्यातून दिसून येते. वर्गात 'ढ' म्हणून ओळख असलेला कथेचा नायक नंतर सर्वाच्या अभिमानाचा विषय कसा होतो अशा प्रसंगातून कथा वाचकाला खिळवून ठेवते, हेच डॉ. विशाल तायडे यांच्या लेखनाचे वेगळेपण आहे, हे विशेष. पुस्तकात प्रसंगाला अनुसरून समर्पक अशी रेखाचित्रांनी विषय लक्षवेधी ठरतो. मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्रातून चित्रकार बुध्दभूषण लोंढे यांची कलात्मचित्रशैलीने पुस्तकाची उंची अधिक वाढलेली दिसून येते. 'ढ' लेखक डॉ.विशाल तायडे सौरव प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर पृष्ठे : ६२ किंमत शंभर रुपये समीक्षण - डॉ सुहास सदाव्रते
ढ डॉ. विशाल तायडे परीक्षेतील गुणांवर बुद्धी मोजू नये, हळू फुलणाऱ्या फुलाला कमी लेखू नये …………… बालसाहित्य लिहिणे निश्चितच सोपे नाही. बालनायकाच्या भूमिकेत शिरून बालसुलभ निरागस शैलीत ते व्यक्त होणे अधिकच आव्हानात्मक. तथापि हे आव्हान डॉ. विशाल तायडे यांनी समर्थपणे पेलले आहे. नुकतीच त्यांची ढ ही बालकादंबरी वाचली. हे एकाक्षरी शीर्षक वाचकांचे मन वेधून घेणारे आहे. ही गजू नावाच्या मुलाची गोष्ट आहे, जी तो स्वतः सांगत आहे. तो ढ आहे हे त्यालाही माहिती आहे. तो अभ्यासात मागे आहे. पण त्याच्या मनात विचारांची वेगळीच दुनिया आहे. तो आकड्यांत, अक्षरात अडखळतो. धड उत्तरे देत नाही. त्याला साधा गृहपाठही जमत नाही. त्याला कोणी मित्र नाहीत. त्याच्याशी खेळायला कोणी तयार नाही. खेळाच्या तासात तो एकटाच वर्गात बसलेला असतो. ढ मानल्या गेलेल्या मुलांच्या वाट्याला येणाऱ्या उपेक्षा, राग, तिरस्कार या गोष्टी त्याच्याही वाट्याला येतात. कथावाचकांना मात्र तसे काही वाटत नाही. वाटते ती हळहळ, आपुलकी व जिव्हाळा. एवढ्या ताकदीने गजूचे पात्र उभे केले आहे. कारण त्याच्यातील जमेच्या बाजू हे तेवढ्याच ताकदीने चित्रित केलेल्या आहेत. तो एकटा आहे पण एकाकी नाही. फुले, फुलपाखरे, नदी, डोंगर, झाडे , सोनी मांजर यांच्याशी त्याची मैत्री आहे. चित्रकलेची त्याला आवड आहे. अभ्यासात गती नसली तरी चित्रकलेत तो गतिमान आहे. रंग त्याच्याशी भांडत नाहीत. कागदावर रेषा रेखाटताना, रंगांच्या छटा भरताना तो अडखळत नाही, इथे तो स्वतःसारखा असतो. तो त्याच्या भावविश्वात दंग असतो. स्वतःची गोष्ट सांगत असताना त्याची निरागसता प्रत्येक प्रसंगातून सुंदररित्या प्रगट होते. उदाहरणार्थ त्याचे स्वतःचे हरवणे, नेलकटरने मांजरीची नखे कापणे, सचिन तेंडुलकर बरोबर क्रिकेट खेळण्याचे दीर्घ स्वप्न. बालवाचकांसोबतच मोठ्यांसाठी ही गोष्ट आहे.कारण ती आहे ढ समजल्या जाण्याच्या वेदनेची आणि स्वतःच्या क्षमतेचा शोध लागण्याची. मुलांसाठी तर आहेच, पण मोठ्यांनाही थोडं आरशात पाहायला लावणारीही आहे. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास हा विचार शिक्षणव्यवस्थेने तात्त्विक पातळीवर स्वीकारलेला असला, तरी प्रत्यक्ष शाळांमध्ये वेगालाच बुद्धीचं मोजमाप मानलं जातं. पटकन वाचणारा, झटपट लिहिणारा, भरपूर गुण मिळवणारा ‘हुशार’ ठरतो; आणि त्या चौकटीत न बसणाऱ्याला लगेच ‘ढ’चा शिक्का बसतो. अभ्यासात गती कमी असणं म्हणजे बुद्धी कमी असणं—हा एक अलिखित नियमच जणू आजही शिक्षणव्यवस्थेत घट्ट रुजलेला आहे. पण ही कादंबरी हीच चौकट मोडते. शिकण्यात मागे पडलेला मुलगा अपयशी नसतो; तो फक्त वेगळ्या गतीने, वेगळ्या वाटेने पुढे जात असतो—हे हळुवारपणे पण ठामपणे सांगणारी ही बालकादंबरी आहे. अशा मुलातील सुप्त गुण व क्षमतांना फुलवणे, विविध अनुभवातून त्यांना शिकण्यास मदत करणे हे शिक्षकाचे व पालकांचे काम आहे. याचे भान असणाऱ्या काही व्यक्ती गजूच्या घरी व शाळेत आहेत. गजू अभ्यासात मागे का पडला आहे? त्यात त्याचा काही दोष आहे का? त्याचे पुढे काय होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुस्तक वाचूनच वाचकांनी मिळवावीत आणि एक सुखद व समृद्ध अनुभव देणाऱ्या वाचनाचा आनंद मिळवावा. ढ जेवढी आशय संपन्न आहे तेवढीच तिची मांडणी देखील अतिशय आकर्षक आहे. सुंदर आकर्षक मुखपृष्ठ व चित्रांनी पुस्तकाचे सौंदर्य वाढले आहे. ब्लर्ब वरील गजूचे मनोगत वाचनाला प्रेरित करणारे आहे. मनात घर करणाऱ्या गजूच्या या गोष्टीने बालसाहित्यात अतिशय मोलाची भर घातली आहे. - आराधना कुलकर्णी,पुणे
महाराष्ट्रातील नव्या पिढीतील एक जाणकार आणि अभ्यासू शिक्षणतज्ज्ञ श्री. संदीप वाकचौरे, अहिल्यानगर यांनी 'ढ' या बालकादंबरीचे केलेले अभ्यासपूर्ण समीक्षण... ---------------------------------------- शिक्षणाचा दृष्टीकोन बदलवणारी बालकादंबरी- ढ शिक्षणाचा खरा आणि नेमका अर्थ कोणता ? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र तत्वज्ञानाच्या परिभाषेत सांगण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला आहे. तरी सुध्दा शिक्षणाचे तत्वज्ञान वेगळे आणि वर्तमानातील वास्तव वेगळे हे आपल्याला सातत्याने अनुभवास येते. प्रत्येक मुल भिन्न आहे अस म्हटले जाते,प्रत्येक मुलाकडे निश्चित काही वैशिष्टयपूर्ण असतात. त्याची दखल शिक्षणात घेतली जात नाही. आपल्या व्यवस्थेने अत्यंत विद्वान,नावाजलेल्या अनेकांना शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले आहे. त्यांच्याकडे असलेल्या वैशिष्टय आणि कौशल्यांचा विचार शिक्षणाच्या प्रक्रियेत केला जात नाही. मुल काय विचार करते यापेक्षा आम्ही काय सांगतो हे महत्त्वाचे ठरते. आम्हाला हवे तसे विद्यार्थी घडायला पाहिजे,त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त शक्तिचा विकासाच्या अनुषंगाने फार काही शिक्षणात घडत नाही. त्यामुळे कांदबरी ज्या गजानन या विद्यार्थ्याभोवती फिरते. . तो गजानन हा शिक्षणाचे नेमके वास्तव आणि अपेक्षांच्या भूमिकेवर बोट ठेवताना दिसतो. त्याच्यामाध्यमातून या देशातील कोटयावधी बालकांचे मनातील भाव कांदबरीत व्यक्त झाले आहे. वर्तमानात शिक्षणाचा अर्थ केवळ मार्क असा झाला आहे. . पण अशावेळी शिक्षणाच्या संदर्भाने नेमका दृष्टीकोन प्रदान करताना पालक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणा-या प्रत्येकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी डॉ. विशाल तायडे यांची ‘ ढ’ ही कांदबरी प्रत्येकानेच वाचायला हवी. कालपर्यंतचा प्रवास,वर्तमानातील दृष्टीकोन आणि भविष्याची वाट यासंदर्भाने नेमकेपणाने भाष्य करत शिक्षणातील कोवळी पानगळीबरोबर अनेकांच्या उज्ज्वलतेच्या वाटा बंद करणा-या शिक्षण दृष्टीकोनावर सौम्यतेने असले तरी एका अर्थाने प्रहार करत भान देणारी ही कांदबरी आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने शिक्षण विषयक दृष्टीकोन पेरण्यात ही कांदबरी निश्चित यशस्वी होते. लेखक स्वतः शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. अधिकारी पदावर असले तरी,मुळात शिक्षणाच्या दृष्टीकोन पेरण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाची भूमिका ते निभावणारे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांनी मनोगताच्या दोन शब्दातच ख-या शिक्षणाचा दृष्टीकोनाची पेरणी केली आहे. परीक्षेतील मार्कांवरून आपण मूलांचे मूल्यमापन करतो. कमी गुण मिळाले की,आपण त्याला ढ म्हणतो. खरच तो ढ असतो का ? की आपल्या मोजपट्टया तिथे कमी पडता आहेत. आपण त्याच्या अंगी असलेल्या इतर गुणांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना ? तसं केल्याने त्याच्या व्यक्तिमत्त्वातील इतर पैलू दुर्लक्षित राहतात. त्याची मते आणि भावना दाबल्या जातात. आपण त्याला समजून घेत नाही. त्यामुळे आपण अधिक चांगला माणूस घडवण्यापासून दूर जातो आहोत. त्यामुळे मुलं स्पर्धेच्या गर्दीत हरवून जाते. शिक्षणातून असं घडत गेल्यामुळे कुंटुंबासोबतच समाजाचे नुकसान घडत जाते. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावेल असं काही केलं पाहिजे असा विचार सांगत,लेखक एकूणच शिक्षणाचा अत्यंत महत्त्वाच्या दृष्टीकोनाची पेरणी या कथानकातून करता आहेत. त्यामुळे ही कांदबरी असली,तरी ही मुळात शिक्षणाच्या दृष्टीकोनाभोवती फिरते आणि नेमकेपणाने शिक्षणातील वर्मावर बोट ठेवताना दिसते आहे. कांदबरीचा नायक असलेला गजानन हा शिक्षणासाठी वर्गात बसण्यापेक्षा त्याला बाहेरचा निसर्ग पाहण्यात अधिक रस असल्याचे दिसते आहे. त्याला बाहेर उडणारे फुलपाखरे आवडतात. त्यांच्याशी हितगुज करायला आवडते. . त्यांच्यासारखे त्याला उडायला आवडते. . मुळात बालपणात मुलांच्या नेमक्या भावना कोणत्या ? याविषयी अत्यंत सुंदरभाव चित्र आरंभीच रेखाटले गेले आहे. वर्गात शिक्षकांनी शिकवल्यानंतर अनेकदा विद्यार्थ्यांना समजत नाही,पण अनेकदा विद्यार्थी भितीने आणि आज्ञाधारकपणे ते मान हलवत हो म्हणतात. त्यामुळे गृहपाठ आणि प्रश्न विचारल्यावर नेमकेपणाने वास्तव कळते. सरांनी शिक्षा केली आणि दरवाजाच्या बाहेर उभे केले की,इतराने शिक्षा वाटते. . ते हसतात,टोमणे मारतात,त्यामुळे आरंभी रडू यायचे. आता रोजच घडू लागले. . पण बाहेर जी मजा आहे ना,ती वर्गात नाही. . हे सांगणारा गजानन शिक्षणाचा प्रवास कोणत्या दिशेने घडायला हवा याची दिशा स्पष्ट करतो. शिक्षण जीवनाभिमुख असावे असे विनोबा नेहमी म्हणत असे,आज शिक्षण आणि जीवन यांचा दुरान्वये संबंध उरलेला नाही. पुस्तक आणि त्यातील माहिती हेच शिक्षण झाले आहे. त्यामुळे मुलांना जगण्यात रस आहे. . आणि व्यवस्थेला पुस्तकाच्या माहितीत आणि मार्कात रस आहे. मात्र त्यासंदर्भाने गजानन पूर्ण कांदबरीत काही सांगतो आहे. . अर्थात तो या देशातील कोटयावधी बालकांचा प्रतिनिधी आहे. वर्गातील घडणा-या गमतीजमतींची नोंद घेतली आहे. दोन फुलपाखरू आणि त्यांचे नातेही विद्यार्थी कसे निर्माण करतात,याची अत्यंत सुंदर मांडणी कांदबरीत करण्यात आली आहे. त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. त्यांना मांडीवर नाही,तर खांद्यावर घेऊन बसायचे आहे. मी बोललेले त्याला समजेल का ? असा प्रश्न विचारत विद्यार्थी किती खोलवर जाऊन विचार करतात,फक्त पुस्तकातील माहिती त्यांना नको असते. . . कारण ती फक्त शब्दांचीच माहिती असते. मात्र त्यापलिकडे त्यांच्या संवेदनाचे प्रतिबिंब अनेक ठिकाणी उमटताना दिसते आहे. त्याला माझी भाषा येत नसेल,तर मी शिकवेल ही भावना मुलांच्या अंतर्मनातील भावना आहे. . सर्वांना सोबत घेऊन जाणे आणि मदत करणे ही मानवीवृत्तीचा स्थायी भाव आहे. माणूसपणाच्या भावभावनाचे अत्यंत तरल चित्र कांदबरीत अधोरेखित करण्यात आले आहे. सरानी शिक्षा केल्यावर फुलपाखरू होऊन गुलाबाच्या झाडावर बसलो असतो. . ही भावना म्हणजे मुलांच्या सर्जनशीलतेचे दर्शन आहे. गजूला चांगला क्रिकेट खेळता येतो. सचिन तेंडूलकर सोबतचे खेळण्याचे स्वप्न. . त्यावेळी त्याचे स्वप्नातील भरारी हे सारे वाचताना शिक्षणात ज्यांना ढ मानले जाते ती मुल देखील किती मोठी स्वप्न पाहतात हे सहज लक्षात येते. सचिन तेंडूलकरसारखे होण्याचे ध्येय आणि तसं स्वप्न हे मानसशास्त्रीय भूमिकेचे होणारे दर्शन मुलांसाठी काय करायला हवं हे दर्शित करणारे आहे. शाळेतील कदमबाई या नव्याविचाराशी नाते सांगणा-या बाई आहेत. मुलांच्या विकासाची प्रक्रिया आणि सुप्त गुणांचा विचारांची त्यांनी जाणीव आहे. त्यामुळे गजाननच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांपैकी अभिनय आणि चित्र रेखाटन याची त्यांना जाणीव असणं. त्यातून स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने गजाननला मिळालेली मूक अभिनयाची भूमिका आणि त्यासाठी त्याला दिलेले प्रोत्साहन,त्याच बरोबर त्याचा आत्मविश्वास वृध्दिंगत करण्यासाठी बाईंने केलेले प्रयत्न वाचायला मिळतात. प्रत्येक मुलं मंचावर जाताना घाबरतेच,मात्र मंचावर जाताना बाईंनी त्याच्या कपाळावर केलेले चुंबन आणि त्यातून झालेला आनंद हे सारे वाचताना मानसशास्त्रीय दृष्टीकोनाची केलेली पेरणी महत्त्वाची ठरते. त्यावेळी त्याने केलेली भूमिका,मिळालेल्या टाळ्या हे सारे पाहिल्यावर घरच्यांच्या व शाळेतील शिक्षकांचा गजाननकडे पाहण्याचा बदलला दृष्टीकोन. त्यानंतर दुस-या दिवशी मुख्याध्यापकांनी बोलावून घेणे,त्याचे कौतुक करणे,त्याच बरोबर चित्राचे रेखाटने पाहण्यासाठी त्याच्या दप्तरातील वह्या बोलावणे आणि त्या पाहणे. शिक्षकांची व्यक्तिचित्र ऱेखाटन,मुख्याध्यापकांचे स्वतःचे चित्र पाहिल्यावर त्यांच्या चेह-यावर उमटलेले हास्य पाहिल्यावर गजूच्या मनातील निघून गेलेली भिती. त्यानंतर 26 जानेवारील चित्रांचे प्रदर्शन आयोजन,त्यासाठी शाळेने मार्गदर्शनाची घेतलेली जबाबदारी,पालकांच्या मनात निर्माण झालेला गौरव त्यातून त्याच्या चित्रकलेच्या विकासासाठी लागणारे आणून दिलेले साहित्य. . हा सारा प्रवास म्हणजे प्रत्येक मुलं भिन्न आहे हे सांगत जाणारी आणि त्याच्या वैशिष्ट्यांची नोंद घेण्यास भाग पाडणारी व्यवस्था उभी केली,तर देशाचे चित्र बदलू शकते. हे मनावर बिंबवले जाण्यास मदत होईल. त्याचवेळी कार्यालयातील कदमबाई आणि मुख्याध्यापक यांच्यातील हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुध्दिमत्ता सिध्दांताच्या संदर्भाने झालेली चर्चा म्हणजे शिक्षणाचा नवादृष्टीकोन पेरणीचा विचार आहे. हे सारे अत्यंत समर्थपणे लालित्याने रंगवण्यात लेखक निश्चित यशस्वी झाले आहे. कांदबरीत शिक्षणाचे तत्वज्ञान पेरताना विद्यार्थ्यांना देखील आपल्यातील सुप्तगुणांच्या विकासाची पेरणी करण्यास दृष्टीदेणारी ही कादबंरी मुलाच्या मनात घर करण्यात यशस्वी झाली आहे. 26 जानेवारीला भरलेले प्रदर्शन,पाहुण्यानी केलेले उदघाटन,त्यांनतर झालेले कौतुक. मोरेकाका बोलायला उभे राहिले आणि त्यांनी गजाननचे चित्रांचे प्रदर्शन पाहण्याचे आवाहन केले. गजाननाने इतक्या लहान वयात अत्यंत सुंदर चित्र काढले आहे. जागतिक चित्रकलेच्या स्पर्धेकरीता गजाननाचे चित्र पाठवले गेले आहे. त्यातील एका चित्राची निवड त्याकरीता झालेली आहे. त्याचे चित्र पॅरिसच्या चित्रप्रदर्शनात ठेवले जाणार आहे. शाळेसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. यासंदर्भातील घोषणा झाल्यावर,झालेला टाळ्यांचा कडकडात,बॅंड पथकाने वाद्ये वाजवण्यास केलेली सुरूवात, हे सारे पाहून गजाननचे भारावणे आणि तेव्हा सर्वांच्या मुखातील “ गजानन,प्राऊड ऑफ यू ” हे उदगार. . हा सारा प्रवास म्हणजे एका ढ विद्यार्थ्याचा अभिमान वाटावा अशा विद्यार्थ्यापर्यंत झालेला प्रवास होता. हे सारे अनुभवताना गजानन हे पात्र देशातील प्रत्येक शाळेत दडलेल्या एक मुल आहे. शाळांनी आणि शिक्षणात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलवला,तर देशातील शिक्षणाचे चित्र बदलू शकते. . हा विश्वास दे-यात ही कांदबरी यशस्वी होते आहे. त्यामुळे वाचक,शिक्षक आणि पालकांच्या दृष्टीकोनात बदल घडवण्याच्या दृष्टीने ही कादंबरी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. शिक्षणाचे तत्वज्ञान,बालमानशास्त्र,अध्यापनशास्त्र अशा विविध शिक्षणाच्या संबंधित विषयांच्या अनुषंगाने जे पेरायला हवे यासंदर्भातील अत्यंत सुंदर मांडणी या बालकांदबरीत वाचायला मिळते. बाल कांदबरी असल्याने तिची भाषा ही अत्यंत सोपी आणि मुलांना समजेल अशीच आहे. भाषा सोपी असली, तरी त्यातून सांगण्यात येणारे तत्वज्ञान मात्र अधिक महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे आहे. ही कांदबरी ज्या तत्वज्ञानावर आधारित आहे,ते तत्वज्ञान समजून घेत समाजमनात परिवर्तन झाले,तर उद्याचे शिक्षणात कोणीच ढ राहणार नाही. मुळात कोणी ढ नसते हा विचार प्रत्येक व्यक्ती कशी वैशिष्टयपूर्ण आहे हे दर्शित करणारे आहे. त्यामुळे शिक्षणात काम करणा-या प्रत्येकाना आत्मपरिक्षण करण्यास ही कांदबरी भाग पाडते. त्यामुळे बालकांदबरी असली, तरी तिचा विषय मात्र मोठयांनाही परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे. पुस्तकाचे नाव-ढ लेखक-विशाल तावडे प्रकाशन-सौरव प्रकाशन पाने-72 किंमत-100

Sunday, March 15, 2026

संत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी जनसंपर्क अधिकारी तथा मुक्त पत्रकार श्री. सुनिल पाटील यांनी 'ढ' या बालकादंबरीवर लिहिलेले अभ्यासपूर्ण समीक्षण... ----------------------------------------------------------------------------- *ज्या 'ढ' शब्दाचा समाजात उपहास केला जातो, त्याच शब्दाला आत्मसन्मानाचा नवा अर्थ मिळवून देणारी विशाल तायडे यांची 'ढ' ही बालकादंबरी आता 'संदीप दळवी पुरस्कारा'ने सन्मानित होत आहे. शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी म.सा. प च्या सभागृहात हा पुरस्कार दिला जाणार आहे. “ढ “ ही केवळ एका मुलाच्या संघर्षाची कथा नसून, ती प्रत्येक पालक आणि शिक्षकासाठी आत्मपरीक्षणाचा आरसा आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने, गजूच्या चित्रमयी जगाचा आणि त्याच्या अंतर्मनातील संघर्षाचा घेतलेला हा विशेष मागोवा...* ———————————————— *कपाळावरचा ‘ढ’ पुसताना...* विशाल तायडे यांची ‘ढ’ ही बालकादंबरी केवळ एका मुलाच्या संघर्षाची कथा नाही; ती आपल्या शिक्षणपद्धतीतील आणि सामाजिक मानसिकतेतील खोलवर रुजलेल्या ‘लेबल संस्कृती’चे विश्लेषण करणारी साहित्यकृती आहे. ‘ढ’ हा शब्द केवळ अक्षर नाही; तो समाजाने लावलेला शिक्का आहे. लेखकाने त्याच शब्दाला कथानकाचा केंद्रबिंदू बनवत आत्मसन्मानाच्या नव्या अर्थाकडे नेले आहे. कादंबरीचा मुख्य नायक गजू आहे. अभ्यासात मागे पडणारा, वर्गात चुकांमुळे हसला जाणारा आणि सतत तुलना सहन करणारा गजू ही व्यक्तिरेखा आजच्या शिक्षणपद्धतीत सहज सापडणारी आहे. गजू जरी शैक्षणिक चौकटीत बसत नसला, तरी त्याच्याकडे चित्रकलेची आणि निसर्ग न्याहाळण्याची एक उपजत देणगी आहे. लेखकाने त्याच्या या सुप्त गुणांचा प्रवास ज्या पद्धतीने मांडला आहे, तो मुलांमधील सुप्त कलागुणांचा शोध घेण्याची गरज अधोरेखित करतो. कादंबरी गजूच्या बाह्य संघर्षाइतकीच त्याच्या अंतर्गत संघर्षाचीही कथा सांगते. गजूच्या अनुभवांतून ‘लेबलिंग’ची प्रक्रिया स्पष्ट होते. एखाद्या मुलाला वारंवार ‘ढ’ म्हटल्यावर ते लेबल त्याच्या आत्मभानात कसे झिरपते, हे लेखकाने सूक्ष्मपणे दाखवले आहे. बालमानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, सततच्या नकारात्मक अभिप्रायामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. कादंबरीत हा प्रक्रियात्मक बदल टप्प्याटप्प्याने दाखविला आहे. गुणाधारित स्पर्धात्मक शिक्षणव्यवस्थेवर अप्रत्यक्ष टीका येथे दिसते. कादंबरीतील मुख्य पात्र शैक्षणिक निकषांवर मागे पडलेले आहे. अभ्यासात कमी गुण, वर्गातील उपहास, तुलना आणि घरातील अपेक्षांचे ओझे या साऱ्यांच्या कचाट्यात त्याचे बालपण अडकते. मात्र कथा करुणेच्या चौकटीत न राहता आत्मशोधाच्या प्रवासाकडे वळते. लेखकाने कथानक रेखीय पद्धतीने मांडले आहे. प्रसंगांची मालिका वास्तववादी आहे; कृत्रिम नाट्य किंवा अतिनाट्यमय वळणे टाळली आहेत. त्यामुळे कथा विश्वासार्ह वाटते. तथापि, काही ठिकाणी प्रसंगांची पुनरावृत्ती जाणवते, विशेषतः नायकाच्या न्यूनगंडाचे चित्रण करताना. मुख्य पात्राचा अंतर्गत संघर्ष हे कादंबरीचे प्रमुख बलस्थान आहे. त्याच्या मनातील संभ्रम, स्वतःबद्दलची लाज, स्वतःला सिद्ध करण्याची तडफ हे सूक्ष्मपणे रेखाटले आहे. सहाय्यक पात्रांमध्ये शिक्षक आणि पालकांचे चित्रण वास्तवदर्शी आहे; काही पात्रांतून लेखकाने आजच्या कोरड्या आणि केवळ धाक दाखवणाऱ्या शिक्षण पद्धतीवर उपरोधिक प्रहार केला आहे. शिकवण्यापेक्षा ओरडण्यावर भर देणारी वृत्ती मुलांच्या मनावर भीतीचा पगडा कसा बसवते, हे गजूच्या उदाहरणातून स्पष्ट होते. सहाय्यक पात्रांमध्ये गजूच्या कदम बाई यांचे पात्र अत्यंत महत्त्वाचे ठरते. संपूर्ण जग जेव्हा गजूला 'ढ' म्हणून हिणवत असते, तेव्हा या शिक्षिकेच्या रूपाने त्याला एक भावनिक आधार मिळतो. मुलाच्या मनात आत्मविश्वासाची पेरणी करण्यासाठी एखाद्या मोठ्या व्यक्तीचा पाठिंबा किती आवश्यक असतो, हे मोरे सर, कदम बाई या पात्राद्वारे प्रभावीपणे उमटले आहे. भाषा साधी, ओघवती आणि बालवाचकांना समजणारी आहे. विशेषतः संवादांमध्ये असलेला प्रादेशिक लहेजा कथेला मातीचा गंध देतो, ज्यामुळे गजूचा संघर्ष आणि त्यातील परिवेश वाचकांना अधिक जिवंत वाटतो. लेखकाने उपदेशात्मक सूर टाळण्याचा प्रयत्न केला आहे काही ठिकाणी लेखकाने संदेश स्पष्ट करण्याच्या हेतूने थेट विधानात्मक शैली वापरली आहे; परंतु बालवाचकांच्या संदर्भात ती परिणामकारक ठरते. संवादांत नैसर्गिकता आहे. लेखकाने उपदेशात्मक सूर टाळण्याचा प्रयत्न केला आहे. भावनिक प्रसंगांमध्ये लेखक संयम राखतो; त्यामुळे कृत्रिम भावनावाद टळतो. ही शैली बालसाहित्यासाठी आवश्यक असलेली संतुलित अभिव्यक्ती दाखवते. ‘ढ’ ही कादंबरी मुलांच्या क्षमतेचे मूल्यमापन केवळ गुणांच्या आधारे करण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य करते. ती सांगते की मुलाचे वेगळेपण हे त्याचे अपयश नसून त्याची ओळख आहे. हा आशय समकालीन शैक्षणिक वास्तवाशी थेट संवाद साधतो. आपण मुलांना समजून घेतो की केवळ गुणांच्या फुटपट्टीवर मोजतो? हा प्रश्न ही कादंबरी पालक आणि शिक्षकांनाही विचारते. कादंबरी वाचतांना काही पात्रे प्रतीकात्मक वाटतात; त्यांची अंतर्गत गुंतागुंत अधिक विस्तारली असती तर कथेला अधिक स्तर मिळाले असते. शेवट आशावादी आहे; मात्र परिवर्तनाची प्रक्रिया अधिक सविस्तर दाखवली असती तर प्रभाव अधिक ठसठशीत झाला असता. "गजूने स्वतःचा स्वीकार करण्याची प्रक्रिया ही इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरू शकते," ‘ढ’ ही कादंबरी केवळ बालवाचकांसाठी नव्हे, तर पालक आणि शिक्षकांसाठीही आत्मपरीक्षणाचा आरसा आहे. काही मर्यादा असूनही तिचा आशय प्रभावी आहे. बालसाहित्यात आत्मस्वीकाराचा विचार प्रामाणिकपणे मांडणारा हा प्रयत्न लक्षवेधी ठरतो. ढ’ हा शब्द येथे अपमानाचा नाही; तो आत्मभानाच्या जागृतीचा आहे. बालसाहित्यात ‘यश’ या संकल्पनेला नवा अर्थ देणारा हा प्रयत्न म्हणून ‘ढ’ची नोंद घ्यावी लागेल. *बाल कादंबरी-“ढ”* *लेखक- विशाल तायडे* *प्रकाशक सौरव प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर* *मूल्य-रु १००/-* —————————————— *परीक्षण*- डॉ.सुनील पाटील,छत्रपती संभाजीनगर 9021777934

 ढ लेखक विशाल तायडे


लातूर / सोलापूर मधून प्रकाशित होणाऱ्या दै. एकमतमध्ये ज्येष्ठ साहित्यिक श्री. उमेश मोहीते यांनी 'ढ' या बालकादंबरीवर लिहिलेले समीक्षण...
-----------------------------------------------------------------------------

 *अनोख्या बालविश्वाची उद्बोधक कहाणी : ' ढ '*


     बालसाहित्यकार विशाल तायडे यांची ' ढ ' ही बालकांदबरी नुकतीच प्रकाशित झाली असून तीमधून लेखकाने बाल-कुमारविश्वाशी संबंधित एक अस्पर्शित नि तितकाच महत्त्वाचा असा विषय कौशल्याने हाताळला आहे आणि वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करून त्यांच्या दृष्टिकोणात बदल घडवण्याचे ' लक्ष्य ' साधले आहे. अर्थात या लेखनाचे प्रयोजनच हे असले तरी या लेखनात कुठेही कृत्रिमता किंवा आशयात कुठेही अतार्किकता वा विसविशीतपणा आलेला नाही, हे विशेष !


 गजू नावाचा अभ्यासात ' ढ ' असलेला एक संवेदनशील मनाचा पाचव्या इयत्तेतील मुलगा स्वतःची दर्दभरी कहाणी सांगतो आहे, अशी कल्पना करुन लेखकाने त्याचे भावविश्व इथे चित्रमय शैलीत मांडले आहे. हा गजू अभ्यासामध्ये ' ढ ' असल्यामुळे त्याला परीक्षेत नेहमी कमी मार्क पडत असतात आणि त्यामुळे त्याला काहीच येत नाही, असा शिक्षकांसहीत सर्वांचा गैरसमज झालेला असतो. त्याच्या या वैगुण्यामुळेच त्याचा घरी-दारी, शाळेत नि मित्रांमध्ये मानसिक आणि शारीरिक छळ होत असतो. परिणामतः या साऱ्या कुचंबणेमुळे तो सर्वांपासून दुरावतो आणि एकटे राहणे पसंत करतो. पुढे मात्र त्याच्यात निसर्गाची ओढ निर्माण होते. त्याचे भावविश्व पक्षी, प्राणी, फुलपाखरे, नदी नि डोंगर यांच्यामध्ये फुलत जाते. एवढेच नाही तर सोनी नांवाच्या मांजरीशीही त्याचे मैत्र जुळते आणि तो तिच्यासोबत मैत्रिणीसारखा बोलू लागतो ; खेळू लागतो. याच काळात त्याला चित्रे काढण्याचा छंद जडतो आणि तो चित्रांमध्ये रमू लागतो. शाळेतही त्याच्या चित्रकलेला बहर येतो. त्यातच एके दिवशी कदम मॅडमच्या दृष्टिस त्याने काढलेल्या चित्रांची वही पडते आणि त्याची चित्रकला पाहून त्या अक्षरशः थक्क होतात. शिक्षण म्हणजे नेमके काय असते, याची अगदी पुरेपूर जाण असलेल्या कदम मॅडम मग त्याच्या खऱ्या अर्थाने शिक्षिका होतात आणि त्याचे खऱ्या अर्थाने ' शिक्षण ' सुरु होते. कदम मॅडम त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्याला प्रोत्साहन देतात. नंतर त्यांच्या मौलिक सहकार्याने अडगळीला पडलेला तो लाजरा- बुजरा गजू पुढे शाळेतल्या सर्वांचा लाडका चित्रकार म्हणून कसा विकसित होतो ? या त्याच्या ' सेल्फ आयडेंटिटी ' साठी कदम मॅडम नेमकी काय पावले उचलतात ? त्याला चित्रकलेचे अद्ययावत असे रंगरेषाविषयक मार्गदर्शन गजूला कोणाकडून मिळते ? नंतर त्याच्या चित्रकलेचा जागतिक पातळीवर कोणाकडून नि कसा गौरव होतो ? संपूर्ण शाळेत तो नावारूपाला कसा येतो ? थोडक्यात शाळेतील एक दुर्लक्षित मुलगा ते घरी-दारी सर्वांनाच त्याचा रास्त अभिमान वाटेल, असा त्याचा अवघड प्रवास कसा होतो ? या सर्वच प्रश्नांच्या उत्तरांसाठी त्या ही प्रेरक कहाणी प्रत्यक्ष वाचणेच इष्ट ठरेल, हे नक्की !

   ... थोडक्यात विशाल तायडे लिखित ही ' ढ ' ची कहाणी शिक्षण विषयक नवा ' दृष्टीकोन ' देणारी असून प्रत्येक मूल म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते आणि त्यामध्ये उपजतच अशी प्रतिभेची देण असते ; मात्र त्या देणगीचा ' शोध ' घेऊन तिला विकसित करता यायला हवे आणि हेच उद्दिष्ट शालेय शिक्षणाचे असते ; कारण त्या मुलाचे खऱ्या अर्थाने तेच ' शिक्षण ' असते, असा काहीसा बोध या उद्बोधक कहाणीव्दारे लेखक विशाल तायडे यांनी सूचित केला आहे. आधी म्हटल्याप्रमाणे या बालकादंबरीचे प्रयोजनच हा ' दृष्टिकोण ' मनी रुजवण्याचा असला तरी ओघवत्या शैलीच्या या लेखनातून ते अगदी अकृत्रिमतेने अभिव्यक्त झाले असल्याचा प्रत्यय येतो. गजूचे कोमल भावविश्व आणि त्याची भावस्पर्शी भावस्पंदने येथे अगदी संवेदनशीलतेने प्रकटली असल्यामुळे तो वाचकाच्या मनात ठसल्यावाचून राहत नाही. एकूणातच नेटके संवाद, सशक्त कथाबीज, जिवंत पात्र चित्रण आणि मोजक्या प्रसंगांतून संपन्न कथानकाची अगदी कल्पकतेने केलेली कुशल मांडणी इ. सर्व घटकांमुळे ही कहाणी मनोरंजन तर करतेच ; पण त्यासोबतच वाचक मनाची जाणीव विस्तृत करावयास भाग पाडते. म्हणूनच म्हणावेसे वाटते की छोट्या गजूची ही नवा आशय व्यक्त करणारी प्रेरक नि आशयसंपन्न कहाणी बालकुमार वाचकांसहित प्रौढ वाचकांच्याही पसंतीस उतरेल, यात संदेह नाही. हेच लेखक विशाल तायडे यांच्या लेखणीचे यश आहे आणि म्हणूनच ते अभिनंदनास पात्र आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

ढ - ( बालकादंबरी )
लेखक - विशाल तायडे
प्रकाशक - सौरव प्रकाशन,छ.संभाजीनगर
                    ( मो.९९२२८६९९५७ )
पृष्ठे - ७२
मूल्य - १००
         - - - - -     
परीक्षण :

उमेश मोहिते,
अंबाजोगाई ( मो.७६६६१८६९२८ )